*विरासत-ए-बणजारा सामाजिक,सांस्कृतिक व ऐतिहासिक राष्ट्रभक्तीचे केंद्र व्हावे-एक चिंतन!*
------------------------------------
प्राचार्य जयसिंग द. जाधव
____________________
*जाणजो, छाणजो पचच माणजो.*
अशी अनेक तथागत गौतम बुद्धांची वचने संत सेवालाल महाराजांचे मुखी पेरण्याचे काम कांही बंजारा लेखक अनेक दिवसांपासून करत आहेत.धाटी शब्दाआडून आपला कोणताही धर्म नाही,असा विचार बंजारा समाजात रुजविण्यासाठी तथागत बुद्धांचे विचार संत सेवालाल महाराजांचे मुखी टाकुन पुस्तके लिहिण्याचे काम सुरू केले.वसंतराव नाईक यांचे कार्यावर शंका उत्पन्न करणारे लेखन केल्या गेले. लोक खाजगीत याबाबत चीड, संताप व्यक्त करत होते, पण पुढे येत नव्हते त्यामुळे मिथ्या गोष्टी मांडण्याचे धारिष्ट्य त्यांच्यात येवु लागले.अखेर प्रा फुलसिंग जाधव यांनी सत्याला सिद्ध करण्यासाठी पाऊल उचलले,त्यांच्या सोबत महाराष्ट्र उभा राहिला.लेखनवॉर सुरू झाले.मते मतांतरे व्यक्त होत राहिली.असत्याचा चेहरा कालावंडला.माझ्या दस्ताऐवजावर हिंदु म्हणून नोंदी जरी असल्या तरी मी बालपणापासून धम्म जीवन जगत आलो आहे व पुस्तकात नोंदविलेले जाणजो, छाणजो पचच माणजो अशाप्रकारचे दहा सुक्त पाली भाषेतील तथागत बुद्धांची असल्याचे त्यांनी मान्य केले व लेखनवॉर प्रकरणाला अर्धविराम मिळाला. वास्तविकता तथागत बुद्धांची आदर्श सूक्ते जीवनकल्याणाची आहेत,यात वेगळे मत असल्याचे कारण नाही. चौर्यकर्म करुन तथागत बुद्धांची सूक्ते संत सेवालाल महाराजांचे मुखी लडी वचन म्हणून स्थापित करणे ही वाटते तशी साधी सरळ गोष्ट नाही, त्यामागे धर्मांतराचा विचार पेरण्याचा कावेबाजपणा असल्याचे आज लोक बोलु लागले आहेत.
सामान्यांचे प्रश्न, विकास, आरक्षण इत्यादी बाबींचे संरक्षण करण्यासाठी लोकशाही व्यवस्था देशात निर्माण केल्या गेली व त्यांना संविधानाचे कवच दिल्या गेले आहे. ही सार्वभौम प्रजासत्ताकाची बांधणी आहे. जर संविधान हाच राष्ट्रधर्म असल्याचे मान्य केले तर धर्मस्वातंत्र्य संविधानानेच बहाल केले आहे, धर्म व्यक्तिस्वातंत्र्य आहे.भारतात हिंदु, मुस्लिम, शिख,इसाई,जैन, बौद्ध व ख्रिश्चन धर्माचे लोक राहतात. अनेक भाषा, अनेक संस्कृती, वेगवेगळ्या श्रध्दा हेच भारताचे अभेद्य बलस्थान आहे.वारकरी संप्रदाय हा हिंदु धर्माचा भाग आहे. पंढरीचा पांडुरंग व संत सेवालाल महाराज पूर्वाश्रमीचे कर्नाटकचे आहेत. पंढरपूरात भागवत धर्माची पताका फडकली. पोहरादेवीला संत सेवालाल महाराजांनी नगारा भजनाच्या माध्यमातून बंजारा समाजाचे अस्तित्व अबाधित ठेवले. दोघांमध्ये कलखंडाचाच काय तो फरक. भागवत पुराण मध्ये बंजारा तांडा माल लादकर घुमता रहता है!असा उल्लेख श्रीमद भागवत मध्ये आहे.
धबुकार,भोग ही बंजारा समाजातील अग्निपूजा कौटुंबिक व सार्वजनिक संक्षिप्त यज्ञेच आहेत.मनु,आर एस एस, भाजप असे राजकीय प्रश्न उपस्थित करुन समाजमन विचलित व कलुषित करण्याचा प्रयत्न कांही लेखक करतांना दिसतात,विषय व मुळमुद्दा भरकटविण्याचा हा प्रकार असल्याचे दिसते.जन्म ते मृत्युच्या मधिल काळास आपण आयुष्य संबोधतो. बंजारा समाजात आयुष्य काळात अनेक विधिसंस्कार केले जातात. मृत्यूनंतरचा अंत्यसंस्कार विधी कर्मकांड ठरत असेल तर मृत देह फेकुन दिल्याने पशुपक्ष्यांच्या कामी येईल असे आपणास सुचवायचे आहे का?
बंजारा तांड्याची रचना,सामाजिक व सांस्कृतिक वैभवाला कांही मापदंड आहेत, हीच आपली प्राचीन व आदिम लक्षणे सिद्ध करणारी ठळक वैशिष्ट्ये आहेत.सांस्कृतिक वैभवावर आघात होत राहिले तर आपले सामाजिक,सांस्कृतिक अस्तित्वही धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही.नदी तलावास मिळते म्हणजे काय होते तर तलावाची जलपातळी वाढते व नदीचे अस्तित्व संपते.असाच बाह्यविचारांचा परिणाम आपल्या मूलभूत घटकांवर होतो. अस्तित्व संपुष्टात येते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगात विठ्ठलाच्या बौद्ध अवताराचा उल्लेख सापडतो पण चंद्रभागेच्या वाळवंटात वारकरी संप्रदायाची पताका फडकतांना दिसते, हे वास्तव मान्य करता आले पाहिजे. संत सेवालाल महाराज यांच्या भजन परंपरेने बंजारा समाजाचे अस्तित्व टिकुन राहिले आहे.गराशागड देऊळगाव साकरशा येथे महाराजांचे काहीकाळ वास्तव्य होते, तेथे आश्रमशाळा परिसरातील पाण्याचा जलस्त्रोत व देवीची स्थापना केली आहे,इतर समाज बांधव या स्थळाला इसाईची टेकडी म्हणून संबोधतात,सराळा ता मेहकर येथे बंजारा समाजाचे एकही घर नाही तरी त्यांच्यावर श्रध्दा ठेवणारा अन्य समाजवर्ग मोठ्यासंख्येने आहेत,चौथऱ्यावर भक्तिभावाने संत सेवालाल महाराजांची पूजा करतात. बुलडाणा चिखली रोडवरील देवीची स्थापना महाराजांनी केली असल्याचे सांगितले जाते.लखिशा बंजारा यांच्या कार्याचा गौरव पंतप्रधान त्यांचे भाषणांतून करतात याचाच अर्थ देशाच्या विकासात बंजारा समाजाचे योगदान अधोरेखित होते. योद्धा लखिशा बंजारा यांच्या मुळे आपण राजधानी दिल्लीशी नाते सांगु शकलो. माजी मुख्यमंत्री व खासदार महानायक वसंतराव नाईक यांच्यामुळे विकासाच्या दोन पायऱ्या चढु शकलो,दुर्लक्षित बंजाराला नाईक ही सामाजिक प्रतिष्ठा मिळाली.अशा महान विभूतीच्या प्रतिमा पायदळी तुडवून आपण वैचारिक मोडतोड करुन इतिहास लिहीत असु तर आपण अनोळखी प्रांताच्या दिगंत प्रवासाला आपल्या बंजारा बांधवांना घेवून त्यांचा कडेलोट करत आहोत असे वाटते.नगारा म्युझियम बंजारा स्वाभिमान असलेल्या ताठ कण्याच्या धरोहर भूमीने आपल्या लेकरांना जाज्वल्य पराक्रमाचा,बंजारा समाजाच्या व्यापारिक दातृत्वाचा,देशसेवेचा परिचय येणाऱ्या अगणित पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल अशी खंबीर भूमिका बजवावी लागणार असल्याने नगारा म्युझियम या वारसा स्थापत्य कलेला सांस्कृतिक मूल्याधिष्ठित अधिष्ठान देणे ही बंजारा समाजाची आर्त हाक आहे.
*अंजामे गुलिस्ता क्या होगा..*
------------------------------------
9923482062
------------------------------------